*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा अधिक बळकट*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आत्मविश्वासपूर्ण शिक्षक, सक्षम वर्गखोल्या निर्माण*
*पालघर जिल्ह्यात शिक्षण परिवर्तनाची*
*शिक्षण क्रांती*
*मॅथ्ससेतू’ने अध्यापनात घडवला बदल*
*एका सत्रातच २९ % गुणांची झेप, शिक्षक–विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत*
*पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन* *मेमन :–* दि. १ जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून राज्यात शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळत असताना, पालघर जिल्ह्यात शालेय शिक्षण क्षेत्रात इतिहास घडवणारे परिवर्तन आकार घेत आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन, सक्षम शिक्षक आणि डेटा-आधारित नियोजन या त्रिसूत्रीवर आधारित पालघर जिल्हा परिवर्तन प्रकल्प (शिक्षण) वेगाने पुढे जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सक्षम वर्गखोल्या, पायाभूत सुविधा,आत्मविश्वासपूर्ण शिक्षक निर्माण होत आहेत.अल्पावधीतच ठोस व मोजता येणारे सकारात्मक परिणाम समोर येणार आहेत.
मोतीलाल ओसवाल फाऊंडेशन आणि लीडरशिप फॉर इक्विटी (LFE) यांच्या सहकार्याने, जिल्हा परिषद व डाएट (DIET) पालघर यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम पालघरला राज्यातील शिक्षण परिवर्तनाचा आदर्श मॉडेल बनवत आहे.
जिल्हा परिषद पालघर, डाएट पालघर यांच्या मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय सामंजस्य करारामुळे (MoU) या प्रकल्पाला मजबूत संस्थात्मक पाया मिळाला आहे.
शैक्षणिक नेतृत्व बळकट करणे, शिक्षकांची क्षमता वाढवणे, वर्गातील अध्यापन अधिक प्रभावी करणे आणि निर्णय प्रक्रियेत डेटाचा शास्त्रीय वापर करणे या उद्दिष्टांवर हा करार आधारित आहे.
या परिवर्तन प्रक्रियेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मानकर तसेच डाएट पालघरच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचे सातत्यपूर्ण पाठबळ लाभत आहे.
डहाणू, तलासरी, वाडा, वसई आणि पालघर या पाच तालुक्यांतील २० शाळा भेटी आणि ७ प्रात्यक्षिक वर्गांमधून शिक्षकांची सज्जता, अध्यापनातील अडचणी व सुधारण्याच्या संधी स्पष्टपणे समोर आल्या.
या थेट निरीक्षणांमुळे पुढील शैक्षणिक नियोजन अधिक अचूक व परिणामकारक झाले आहे.
‘मॅथ्ससेतू’ने तलासरीत निर्माण केला आत्मविश्वास
तलासरी तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या ‘मॅथ्ससेतू’ कार्यक्रमाने शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.
१२ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिकृत मंजुरीनंतर २८ नोव्हेंबर रोजी २० शिक्षकांसाठी पहिले प्रशिक्षण सत्र यशस्वीरीत्या पार पडले.
शालेय शिक्षणात गुणवत्तेचा नवा मानदंड ठरवत ‘मॅथ्ससेतू’ सत्र–१ ने अल्पावधीतच ठोस आणि मोजता येणारे परिणाम दिले आहेत. केवळ एका सत्रात २९ % गुणांची सरासरी सुधारणा नोंदवली गेली असून, पूर्व चाचणीत ३८ टक्के असलेली कामगिरी उत्तर चाचणीत थेट ६७ टक्क्यांवर पोहोचली आहे.
या उपक्रमामुळे अध्यापन पद्धतीत बदल घडून येत असल्याचे स्पष्ट झाले असून, NLG ०.४८ नोंदवला गेला आहे, जो मध्यम ते उच्च शिक्षण लाभ दर्शवतो. शिक्षक आणि प्रशिक्षणार्थींनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
उपयुक्तता आणि सहभागाला उच्च गुण
‘मॅथ्ससेतू’ सत्राला उपयुक्तता ३.९/४ आणि सहभाग ४/४ असे उच्च गुण मिळाले असून, सत्रातील सहभाग पूर्णपणे सक्रिय आणि परिणामकारक राहिला आहे .प्रशिक्षणाच्या रचनेमुळे संकल्पनात्मक स्पष्टता, अध्यापनातील आत्मविश्वास आणि वर्गातील संवादात लक्षणीय सुधारणा दिसून आली.
NPS ६८.८ समाधानाचा ठोस निर्देशांक असून
प्रशिक्षणानंतर नोंदवलेला NPS (Net Promoter Score) ६८.८ हा शिक्षकांचा उच्च समाधान स्तर दर्शवतो. विशेष म्हणजे ६३ टक्के शिक्षकांमध्ये आत्मविश्वास व कार्यक्षमता वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.
उत्तर चाचणीत २७५ टक्के झेप
सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे, उत्तर चाचणीतील कामगिरीत २७५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ केवळ गुणांची नसून, संकल्पनांची समज, अध्यापनातील सुसूत्रता आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलाची साक्ष देणारी आहे.
शिक्षणात परिणामकारक धोरणाचे उत्तम उदाहरण आहे
‘मॅथ्ससेतू’ उपक्रमाने सिद्ध केले आहे की, संरचित प्रशिक्षण, डेटा-आधारित मूल्यमापन आणि सक्रिय सहभाग यांच्या माध्यमातून अल्पकालावधीतही शिक्षण क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल घडवता येतो.
हा उपक्रम शिक्षक सक्षमीकरणाचा प्रभावी नमुना ठरत असून, भविष्यातील शैक्षणिक सुधारणांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
मापन (लांबी, वजन, आकारमान, हालचाल) विषयांवरील प्रशिक्षणामुळे शिक्षकांचे विषय प्रभुत्व आणि अध्यापन कौशल्ये अधिक प्रभावी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या यशाची दखल तलासरी तालुका प्रशासनाने अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून घेतली, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
१,६०० मास्टर ट्रेनर्समुळे जिल्हाभर शैक्षणिक साखळी मजबूत
पालघर जिल्ह्यात १,६०० मास्टर ट्रेनर्स निश्चित करण्यात आले असून, हे प्रशिक्षक क्लस्टर आणि शाळा स्तरावर शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्याची मुख्य जबाबदारी पार पाडणार आहेत.
याच अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी ३०० मास्टर ट्रेनर्ससाठी जिल्हास्तरीय शिक्षण परिषद, तर २४–२५ नोव्हेंबर रोजी अग्रिवाड्यासह विविध केंद्रांवर प्रशिक्षण सत्रे यशस्वीरीत्या पार पडली.
‘निपुण भारत’ अभियानाअंतर्गत ICDS, DIET आणि QUEST यांच्या सहभागाने झालेल्या जिल्हा समन्वय बैठकीत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानासाठी LFE च्या शैक्षणिक सहकार्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यामुळे बालवयातील शिक्षण अधिक भक्कम, शास्त्रीय आणि परिणामकारक होणार आहे.
आगामी काळात मॅथ्ससेतूचा विस्तार
वर्ग निरीक्षण व शिक्षक प्रशिक्षण ,‘पूर्व व पश्चात’ मूल्यमापन प्रणाली,
जिल्हा डॅशबोर्ड व डेटा विश्लेषण,
आणि मास्टर ट्रेनर टास्क-ग्रुपची औपचारिक रचना या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी शैक्षणिक धोरणामुळे पालघर जिल्हा गुणवत्तापूर्ण अध्यापन, आत्मविश्वासपूर्ण शिक्षक आणि दीर्घकालीन शैक्षणिक क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. पालघरचा हा शिक्षण परिवर्तनाचा प्रवास राज्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे.