पालघरच्या वैभवात भर *९९ हेक्टर विस्तीर्ण 'पालघर इको पार्क'चे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन*.

पालघर  जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :–  दि. १५ : पालघर शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात मोलाची भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'पालघर इको पार्क' प्रकल्पाचा भूमिपूजन आणि कार्यारंभ सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री  गणेश नाईक यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाची विधिवत पायाभरणी करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक (ठाणे)  एन. आर. प्रवीण आणि उपवनसंरक्षक (डहाणू)  निरंजन दिवाकर यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री गणेश नाईक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले 
  हा प्रकल्प पालघरकरांसाठी निसर्गाच्या सान्निध्यात एक हक्काचे विरंगुळा केंद्र ठरेल आणि शहराचे 'ग्रीन लंग्स' (Green Lungs) म्हणून कार्य करेल, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

डहाणू वन विभागामार्फत साकारला जाणारा हा प्रकल्प पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वन परिक्षेत्र क्रमांक १३१ मध्ये स्थित आहे. एकूण ९९ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या या भव्य प्रकल्पासाठी अंदाजे १३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, याचे काम २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षाच्या कालावधीत तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वेगाने शहरीकरण होत असलेल्या पालघर शहरात पर्यावरणीय समतोल राखणे आणि नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निसर्गाचा अनुभव देणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उ‌द्दिष्ट आहे.

'पालघर इको पार्क' हे केवळ एक उ‌द्यान नसून ते आरोग्यासाठी आणि निसर्ग शिक्षणासाठी एक परिपूर्ण
संकुल असणार आहे. यामध्ये नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी जॉगिंग आणि वॉकिंग ट्रॅक, कमी जागेत
घनदाट वृक्षराजी निर्माण करणारे 'मियावाकी घनवन' आणि मानसिक शांततेसाठी विशेष 'योग साधना
मंच' अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याशिवाय, 'बँबुसेटम' च्या माध्यमातून बांबूच्या विविध प्रजातींचे जतन, स्थानिक वनस्पती आणि प्राणी यांची ओळख, तसेच स्थानिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विशेष विभाग विकसित केले जातील.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालघरच्या नागरिकांना निसर्गाशी जोडले जाण्याची संधी मिळेल आणि त्यांच्यात निसर्गाप्रती आपुलकीची भावना वाढीस लागेल, असा वनविभागाचा मानस आहे. येत्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने पालघरच्या सेवेत रुजू होईल.

Post a Comment

Previous Post Next Post