एकतेचा अनोखा वारसा : काळमाथा गावात उत्सवात बंद राहतात चुली

औसा :-(प्रतिनिधी) :- काळ्या भुईचे गाव म्हणूनचं काळमाथा त्याचं नाव ! गावच्या वार्षिक उत्सवात पेटत नाही एकही चूल ! 
भादा: भारत आणि चीन युध्दाच्या वेळी एका शिव उपासकाने सुरू केलेल्या धार्मिक उत्सवाची परंपरा  काळमाथा गावातील नागरिकांनी आजही एकसंघ राहून जपली आहे .  या वार्षिक शिव आराधना उत्सव कालावधीत नित्य सामुदायिक महाप्रसाद होत असल्याने गावात एकही चूल पेटवली जात नाही हे विशेष.
तावरजा प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर १९७८ ते १९८६ या काळात काळमाथा गावचे पुनर्वसन करण्यात आले असून जुने गाव आज तावरजा क्षेत्राच्या कुशीत दडलेले असले तरी त्याकाळी तिथून सुरू झालेल्या परंपरा गावाने  आजही अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. तावरजा व नागझरी या नद्यांच्या संगमावर आजही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे एक  शिवमंदिर आहे . जेंव्हा भारत चीन युद्ध सुरू झाले होते तेंव्हा या युध्दाला लवकर पुर्णविराम मिळावा यासाठी 
या मंदिरात सखाराम महाराज या साधकाने साधना केली होती आणि युद्धविराम होताच महादेवांची उपासना करून तब्बल ५१ गाड्या स्वतःच्या खांद्यावर भार घेऊन ओढल्या होत्या अशी अशी माहिती येथील जेष्ठ नागरिक रामकिशन मोहिते यांनी दिली. दरम्यान त्याकाळी सुरू झालेला हा उत्सव आजतागायत अत्यंत भक्तिभावाने सुरू असून आजही सखाराम महाराज यांच्या शिष्यांकडून गाड्या ओढल्या जातात तेंव्हा सारा गाव हरहर महादेव या जयघोषात गुलालाने न्हाऊन जातो तेंव्हा इथे शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे व कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाचे अस्तित्व असल्याची जाणीव होते. काळमाथा या गावचे शिवार काळ्या भुईचे असून इथे काळोबा या शक्तीचे महत्व असल्याने या गावचे नामकरण काळमाथा झाले अशी माहिती बाळासाहेब मोहिते यांनी दिली. अनेक दशकांपासून सुरू असलेला हा वार्षिक उत्सव यंदा २४ मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताह व राम कथेने सुरू झाला आहे. याची सांगता आज ३० मार्च रोजी काला किर्तन होवून महाप्रसादाने होत असून सायंकाळी गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असल्याने गावात मोठा उत्साह आहे. 
 यानिमित्ताने सारा गाव एकवटून शिव भक्तीत लीन झाला आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या या मंदिरात दंडवत घालण्यासाठी व नारळांचे तोरणं बांधण्यासाठी श्रद्धाळू भाविकांची मोठी गर्दी दिसून येत असून यावर्षी या उत्सवकाळात आलेल्या रामनवमीचा उपवास अख्ख्या गावाने एकत्रित येऊन केला अशी माहिती वैदीक संस्कृतीचे येथील पाईक प्रभाकर कुलकर्णी यांनी दिली.....
चौकट करावी.......
संगमावरील मंदिर तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे.....
तावरजा प्रकल्प निर्मिती झाल्यानंतर गाव पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी बराच काळ गेला ‌ अत्यंत कष्टकरी शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गाव औसा व लातूर तालुक्याच्या सीमेवर असून सात दशकांची धार्मिक परंपरा इथे सुरू असताना या परंपरेचे उगमस्थान असलेल्या संगमावरील मंदिराला तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे व हा भाग पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा अशी अपेक्षा आहे...... बालाजी मोहिते सरपंच

Post a Comment

Previous Post Next Post